आहूस (डेन्मार्क) – थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने ताहिती संघाचा 5-0 असा दणदणीत पराभव केला.
हा भारताचा या स्पर्धेतील दुसरा निर्विवाद विजय ठरला. यापूर्वी भारताने थायलंडचा असाच 5-0 असा धुव्वा उडवला होता. क गटात आता या सरस कामगिरीसह भारतीय संघ पहिल्या दोन स्थानांमध्ये आला आहे.
भारताच्या बी साईप्रणितने केवळ 23 मिनिटे चाललेल्या लढतीत लुईस बेओबुसवर 21-5, 21-6 अशी मात केली. समीर वर्माने रेमी रोसी याचा 21-12, 21-12 असा पराभव केला.
किरण जॉर्जनेही एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात एलिस मोब्लॅंकचा 21-4, 21-2 असा धुव्वा उडवला. दुहेरीच्या सामन्यात भारताच्या कृष्ण प्रसाद व विष्णू वर्धन या जोडीने लुईस बेओबुस व रेमी रोसी यांचा 21-8, 21-7 असा पराभव करत आगेकूच केली.
दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी एलिस मोब्लॅंक व हेइवा व्होनेट जोडीवर 21-5, 21-3 अशी सहज मात केली.