जीडीपीची निच्चांकी
नोंद उणे 23.9
नवी दिल्ली – देश आता महामंदीच्या गर्तेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे अधिकृतपणे जाहीर झाले असून देशाचा विकासदर आता उणे 23.9 टक्के इतका झाला आहे. देशातील जीडीपीमध्ये झालेली ही घसरण अभूतपूर्व स्वरूपाची आहे. अशियातील अन्य देशांच्या तुलनेतही भारताची ही आर्थिक घसरण मोठ्या स्वरूपाची आहे.
या आधीच्या तिमाहीत विकासदर घटून 3.1 टक्के इतका होता आता तर तो शून्याच्याही खाली गेला आहे. देशात करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा हा परिणाम मानला जात आहे. यापुढील तिमाहीतही हा दर असाच खाली राहण्याची शक्यता आहे कारण या तिमाहीत जुलै तर सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीतील आर्थिक उलाढालीची नोंद घेतली जाणार आहे. या अवधीतही करोनाच्या लॉकडाऊनचा मोठा विपरित परिणाम झाला होता.
देशातील अर्थ तज्ज्ञांनी या तिमाहीतील जीडीपी दर साधारणपणे उणे 15 ते 20 टक्के राहील इतका अंदाज वर्तवला होता पण प्रत्यक्षात तो त्याही पेक्षा खाली गेला आहे. लागोपाठ दोन तिमाहीत जीडीपीचा दर घसरला तर ते मंदीचे लक्षण मानले जाते. आर्थिक घसरणीच्या या स्थितीला काहीजणांनी महामंदी असे संबोधले आहे. केंद्र सरकारने करोनामुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक स्थितीवर उपाय म्हणून 21 लाखांचे पॅकेज जाहीर केले होते. तथापि, यातील बऱ्याच तरतुदींचा अर्थसंकल्पातच समावेश होता व बऱ्याच तरतुदी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांसाठी आधी जाहीर केलेल्या सवलतींशी संबंधित होत्या. त्यामुळे या पॅकेजचा आर्थिक स्थिती सुधारण्यास फार उपयोग होणार नाही असे भाकित अनेकांनी या आधीच वर्तवले होते.
या तिमाहीत व्यापार, हॉटेल्स, परिवहन, दूरसंचार क्षेत्रात 47 टक्के इतकी घट झाली. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 39.3 टक्के इतकी घट झाली, बांधकाम क्षेत्रात 50.3 टक्के इतकी घट नोंदवली गेली. तर खाण उद्योग क्षेत्रात 23. 3 टक्के इतकी घट नोंदवली गेली आहे. फक्त कृषी क्षेत्रात मात्र 3.4 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे त्यामुळे भारतीय अर्थकारणाला काडीचा तरी आधार मिळाला आहे.