मुंबई – केंद्र सरकारने 21 दिवसाचे लॉक डाऊन करोना वायरसमुळे जाहीर केले आहे. मात्र या कालावधीत देशामध्ये कोणत्याही इंधनाची टंचाई जाणवणार नसल्याचे इंडियन ऑईल कार्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी सांगितले आहे.
त्यांनी याबाबत बोलताना म्हटले की, देशाकडे 1 महिना पुरेल एवढे पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध ठिकाणी इंधन वाहून नेण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. कंपन्यांचे या परिस्थितीकडे बारीक लक्ष असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ग्राहकांनी टंचाई निर्माण होईल या शंकेमुळे कोणतेही इंधन आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करू नये असा आग्रह त्यांनी केला.
एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्या इंधनाची किती आवश्यकता आहे याचा हिशोब आम्ही केला आहे. त्यानुसार तेलशुद्धीकरण कारखाने काम करीत आहेत. शुद्धीकरण केलेल्या तेलाला भारतातील कानाकोपऱ्यात पाठविण्याचे वेळापत्रक तयार आहे. रस्त्यावर फारशी रहदारी नसल्यामुळे या वेळापत्रकावर कसलाही परिणाम होणार नाही असे त्यांनी सांगितले. मात्र देशवासीयांचे बहुतांश व्यवहार थांबविले असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून तेल कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होणे सहाजिक आहे.
त्यामुळे तेल कंपन्यांच्या ताळेबंदावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. मात्र या परिस्थितीत या बाबी समजून घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. या परिस्थितीमुळे पेट्रोलची मागणी 8 टक्क्यांनी, डिझेलची मागणी 16 टक्क्यांनी तर विमानाच्या इंधनाची मागणी 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. आगामी काळातही मागणी आणखी कमी होणार आहे.
मात्र स्वयंपाकाच्या गॅसच्या मागणीत मात्र बरीच वाढ झाली आहे. कारण सर्व नागरिक घरी बसून आहेत. स्वयंपाकाच्या गॅसची ही मागणी पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत. स्वयंपाकाच्या गॅसचा कसलाही तुटवडा जाणवणार नाही याची आम्ही काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही इंधनाच्या कमतरतेबाबत कसलीही शंका घेण्याचे काही कारण नसल्याचे ते म्हणाले.