नवी दिल्ली – देशाने आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचा दावा केंद्र सरकारने केला असला तरी देशावरील एकूण कर्जाचा बोजा आता तब्बल 147.19 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढला असल्याचे दिसून आले आहे.
सार्वजनिक कर्जाच्या संबंधात केंद्र सकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीतून हीं बाब समोर आली आहे. दर तीन महिन्यांच्या आकडेवारीत हे कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढतच असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. अर्थमंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.
या वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 406000 कोटी रूपये डेटेड सिक्युरिटीजच्या माध्यमातून उभे केले आहेत.अर्थमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत देशाच्या विदेशी चलनाचा साठाही मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे दिसून आले आहे.
24 सप्टेंबर 2021 रोजी देशाच्या विदेशी चलन साठ्यात 638.64 अब्ज डॉलर्स इतका निधी होता परंतु तो 30 सप्टेंबर 2022 रोजी 532.66 अब्ज डॉलर्स इतका घसरला आहे. 1 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या अवधीत रूपयाची किंमतही 3.11 टक्क्यांनी घसरली आहे. रूपयाची सतत होणरी घसरणही चिंतेची बाब ठरली आहे.