हैदराबाद: कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाचा आज वेस्ट इंडिजशी 3 टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे.
अफगाणिस्तानशी भारतात खेळल्यामुळे यावेळी वेस्ट इंडिजला येथील खेळपट्ट्यांचा चांगलाच सराव मिळालेला आहे, त्यामुळे प्रत्येक मालिकेत परदेशी संघांना भारतीय खेळपट्टीचे आव्हान असते तसे चीत्र या मालिकेत दिसण्याची शक्यता कमी आहे. भारतात आल्यापासून पाहुण्या संघाने कसून सराव केला आहे.
तसेच त्यांचा कर्णधार कॅरन पोलार्ड याच्यासह संघातील आणखी काही खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सातत्याने खेळत असल्याने त्यांना भारतात खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. आज हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
कोहलीसाठी प्लॅन तयार – सिमन्स
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध आमचा प्लॅन तयार असल्याचा इशारा वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी दिला आहे. कोहलीला लवकरात लवकर बाद करणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे. समोर कोहली आहे असे समजुन नव्हे तर केवळ एक फलंदाज आहे असे समजुन गोलंदाजी केली तर कोणतेही दडपण येणार नाही. गोलंदाजांनी त्याला स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली तर त्याच्यावरच वेगाने धावा करण्याचे दडपण येईल. कोहलीने आमच्याविरुद्ध सातत्याने धावा केल्या आहेत.
गोलंदाजांनी कोहलीला घाबरून तसेच दडपण घेऊन गोलंदाजी केल्यास ते कधीच त्याला बाद करण्यात यशस्वी होणार नाहीत. कोहलीला बाद करण्याच्या काही योजना आखल्या आहेत, असेही सिमन्स म्हणाले. वेस्टइंडीज संघाला त्यांच्याच देशात पराभुत केल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याचबरोबर भारताने मायदेशात झालेल्या मालिकादेखील यंदाच्या मोसमात सहज जिकलेल्या असल्याने या मालिकेत भारतालाच संभाव्य विजेते समजले जात आहे.
रोहितला विक्रमाची संधी... भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला सर्वाधिक षटकार मारणारा भारताचा पहिला फलंदाज बनण्याची या सामन्यात संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिनही प्रकारात मिळुन 400 षटकार फटकावण्यासाठी त्याला केवळ एका षटकाराची गरज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक 534 षटकारांची नोंद आहे. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी 476 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितचे 399 षटकार आहेत त्यामुळे केवळ आणखी एक षटकार त्याला तिसरे स्थान मिळवुन देणार आहे.