नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर चीन आणि पाकिस्तानी सैन्याबरोबरच्या युद्धसरावात भारत सहभागी होणार नाही. रशियामध्ये होणाऱ्या “कावकाझ-2020′ या युद्धसरावात आपले सैन्य सहभागी होणार नसल्याचे रशियाला कळवले जाणार आहे.
सध्या देशात कोविड-19 च्या साथीमुळे निर्माण झालेली स्थिती फार वाईट आहे. सध्या भारतात 70 हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळेही दक्षिण रशियातील ऍस्ट्राखानमधील युद्धसरावात सहभागी होता येणार नाही, असेही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
चीनबरोबरचा प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नाही. 4 हजार किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारतीय लष्कराला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या पार्श्वभुमीवर परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांम्ध्ये आलेल्या बैठकीत चीन आणि पाकिस्तानबरोबरच्या या युद्धसरावात भारताने सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 4 ते 6 सप्टेंबरदरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी रशियाला जाणार आहेत. मात्र या बैठकीदरम्यान चीनच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर तेथे काही चर्चा होण्याची शक्यता नाही. या बैठकीच्या वेळी भारतीय सीमेजवळील चीनच्या विस्तारवादी धोरणाचा मुद्दाही उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय बैठकीपूर्वी घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.