नवी दिल्ली : देशात जर लॉकडाऊन जाहीर केला नसता तर कोरोनाने चार एप्रिलपर्यंत 31 हजार जण बाधित झाले असते, असे शिव नादर विद्यापीठाच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. अर्थात 21 दिवासांच्या लॉकडाऊनच्या काळानंतर कोरोनाचा धोका टळलेला नसेल असे या अहवालात म्हटले आहे.
या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या विरोधातील लढ्याची तयारी करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला आहे, असे प्रा. समित भट्टाचार्य आणि नागा सुरेश वीरपू यांनी म्हटले. देशातील लोकसंख्येच्या 80 ते 90 टक्के लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले असल्याचे गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 20 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे बाधितांची संख्या 85 टक्क्यांनी कमी झाली. या उपाय योजनेमुळे प्रसाराचा वेग मंदावला, असे या अहवालात म्हटले आहे.
या प्रतिबंधात्मक उपायांमुळे व्यक्तीगत बाधा नियंत्रणात राहिली असे नव्हे तर तर त्यामुळे सर्व समाजाला संरक्षण मिळाले आहे, असे नमूद केले आहे. या प्रतिबंधात्मक उपायात मोठ्या सामुहिक कार्यक्रमांवर बंदी, संशयीत बाधितांचे 14 दिवस विलगीकरण, पध्दतशीर सर्वेक्षण, कोरोना चाचणीचा वेग वाढवणे आणि घरी बसून काम असे उपाय सुचवले आहेत.