नवी दिल्ली – उत्तरी बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात हिंदू समुदायाचे प्रमुख नेते भाबेशचंद्र रॉय यांची त्यांच्या घरातून अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भारत सरकारने तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. 58 वर्षीय भाबेशचंद्र रॉय यांचे बुधवारी संध्याकाळी चार हल्लेखोरांनी अपहरण केले. त्यांच्या पत्नी शांतना यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी फोनवर रॉय यांच्या उपस्थितीची पुष्टी केली आणि त्यानंतर दोन दुचाकीवर आले त्यानंतर त्यांचे अपहरण केले. गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिस आणि कुटुंबीयांनी दिली.
रॉय यांच्या हत्येवर भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे घरातून अपहरण करून त्यांना क्रूर मारहाण करण्यात आली. भारताने शनिवारी या हिंदू नेत्याच्या हत्येचा तीव्र निषेध केला.
MEA Spokesperson Randhir Jaiswal tweets, “We have noted with distress the abduction and brutal killing of Bhabesh Chandra Roy, a Hindu minority leader in Bangladesh. This killing follows a pattern of systematic persecution of Hindu minorities under the interim government even as… pic.twitter.com/vGIaCXu8pi
— ANI (@ANI) April 19, 2025
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर निवेदन जारी करत म्हटले, “बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यक नेते भाबेशचंद्र रॉय यांच्या अपहरण आणि हत्येची बातमी ऐकून आम्हाला अत्यंत दुख: झाले आहे. ही घटना हिंदू अल्पसंख्यकांविरुद्ध होत असलेल्या सातत्यपूर्ण आणि सुनियोजित छळवणुकीचे द्योतक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वीच्या अशा घटनांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा न झाल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
भारताने बांगलादेश सरकारला अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्याही बहाण्याशिवाय पार पाडण्याची आठवण करून दिली आहे. ही घटना बांगलादेशातील अल्पसंख्यकांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याचे कारण ठरू शकते आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी महत्त्वाची आहे.