नवी दिल्ली/बिजिंग – भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून सुरु असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही देशांनी केलेल्या करारानुमसार वादग्रस्त भागातून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे देप्सांग पठार आणि देम्योक या ठिकाणी २०२०पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. या निर्णयामुळे भारत–चीन सीमेवरील तणाव निवळला असल्याचे मानले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील तणावग्रस्त भागात गस्त घालण्यासह शांतता स्थापित करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये गेल्या आठवडयात करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या करारानुसार दोन्ही देशांकडून सीमेवरील सैन्य परत बोलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आली आहे. आता दोन्ही देशांच्या अधिकारी या भागांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे.
ही पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. मात्र, भारतीय सैनिकांना याची पूर्व कल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधकारक आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाचप्रकारची व्यवस्था आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील वादग्रस्त भागांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे लष्काराच्या सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, भारत आणि चीन सैन्यामध्ये मे २०२० पासून सीमेवर तणाव आहे. गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी २० जवान शहीद झाले होते. तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता.