नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांतील लष्करी पातळीवरील कमांडर पातळीवरील नववी बैठक उद्या होत आहे. ही बैठक भारतीय हद्दीतील मोलडो येथे होईल. दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाख येथे जो तणाव निर्माण झाला आहे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीत होईल, असे सांगण्यात येते.
लडाखमधील भारतीय हद्दीत अनेक ठिकाणी चीनकडून घुसखोरी झाली आहे. ती मागे घेण्यास चीन तयार नाही. त्यामुळे भारताने तेथे आपले 50 हजारांचे सैन्य युद्धसदृश स्थितीत तयार ठेवले आहे. चीननेही तेथे तितक्याच प्रमाणात सैन्य तैनात केल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून त्या भागात कमालीच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातून जोपर्यंत चीन आपले सैन्य मागे घेत नाही तोपर्यंत भारतीय सैन्यही तेथून मागे घेतले जाणार नाही, असे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी कालच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बैठकीत चीन आता काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.