नवी दिल्ली – भारत आणि चीन सैन्य पुन्हा एकदा समोरा समोर उभे ठाकल्याची घटना घडली आहे. आता अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने मुजोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक समोरा-समोर आले होते.
दोन्ही सैन्यांमध्ये एलएसीबाबत वेगवेगळ्या धारणा आहेत, त्यावरुनच अनेकदा हे सैनिक समोरा-समोर येतात, इथे स्पष्ट अशी सीमा नसल्याचे मानले जाते. दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांसमोर आल्यानंतर काही तास वाद झाला, त्यानंतर प्रोटोकॉलच्या आधारावर चर्चेद्वारे हा संघर्ष सोडवला गेला.
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फेसऑफमध्ये कुणालाही काहीही झाले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-चीन सीमेचे अधिकृतपणे सीमांकन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे दोन्ही देशांमधील धारणामध्ये फरक आहे. दोन्ही देशांमधील विद्यमान करार आणि प्रोटोकॉलचे पालन करून, या क्षेत्रांमध्ये शांतता ठेवली जाते.
दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या सीमा क्षेत्रात गस्तीवर असतात, पण काही ठिकाणी ही सीमा स्पष्ट नाही, त्यामुळे बऱ्याचदा दोन्ही सैन्यांचं फेसऑफ होतं. अशावेळी प्रोटोकॉलनुसार बोलणी केली जातात, आणि दोन्हीकडचे सैनिक मागे हटतात. पण, यावेळी माघार घेण्याआधी बराच वेळ वाद झाला. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.