न्युयॉर्क: अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता असून त्यातून जागतिक व्यापारावर विपरीत परिणाम होऊ शकतो पण ब्राझील आणि भारताला मात्र या संधीचा चांगला लाभ मिळू शकतो.
करोनामुळे व्यापार व अर्थ क्षेत्रात या देशांची जी बिकट अवस्था झाली आहे त्यातून त्यांना या संधीचा लाभ घेऊन आपली अर्थव्यवस्था सुधारता येऊ शकेल असे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम
राजन यांनी म्हटले आहे.
या संबंधात आपले विस्तृत भाष्य करताना त्यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था सुधारण्याच्या नादात जी भांडवली स्ट्रक्चरची पुनर्बांधणी केली जाईल त्यातून अमेरिका आणि युरोपातील अनेकांवर दिवाळखोरीचीही स्थिती येऊ शकते.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका जशा जवळ येतील तसे अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अधिक उग्र होऊ शकतो. ती स्थिती भारत, ब्राझिल, मेक्सिको अशा देशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोविड नंतरच्या जगाची नवी अर्थव्यवस्था या विषयावर अमेरिकेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
माल, सेवा आणि डिजिटल सर्व्हिस अशा सर्व क्षेत्रातील व्यापाराला आता मोठी संधी आहे. तथापि आता जग खुले होण्याची गरज आहे, आपले देश त्याचीच आता वाट पहात आहेत असे ते म्हणाले. अजूनही करोनाचा धोका संपलेला नाही. मेक्सिकोसारख्या देशांमध्ये लॉकडाऊनच्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून आलेले नाहीत.
भारत आणि अमेरिका हे देशही अजून करोनाशी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेपुढील सध्याचे सर्वात मोठे आव्हान या रोग नियंत्रणाचे आहे. करोनाची स्थिती अजून कोणते वळण घेईल याचा अंदाज लागत नसल्याने पुन्हा अनेक ठिकाणी लॉकडाऊन सारख्या उपायांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करोना नियंत्रणाचा मोठा अडथळा आपल्याला पार करावा लागेल असे ते म्हणाले.