नवी दिल्ली – बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीला स्थान न दिल्याने भारताने 2022 सालच्या राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रकूल क्रीडा महासंघाने भारताला फटकारले असून आगामी स्पर्धेत कोणत्या खेळ प्रकारांना प्राधान्य द्यावे, याचा सर्वस्वी निर्णय हा स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्राकडे आहे, अशी भूमिका राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतली आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजी हा पर्यायी खेळ असल्याचा उल्लेखही महासंघाने केला आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी बहिष्काराच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे अवधी मागितला आहे. यापूर्वी आयओएने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या खांडा येथे साधारण सभेतून माघार घेतली होती. या विषयी बोलताना बत्रा म्हणाले, भारताच्या चांगल्या कामगिरीनंतर नेहमी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न होतो.
आयओएच्या अध्यक्षांनी पत्रात लिहिले आहे, 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवत आहे. भारत विरोधी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, हे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला दाखवून देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.