मुंबई: भारतीय फुटबॉल संघाने दक्षिण आशियाई देशांमधील आपलं फुटबॉलचं वर्चस्व कायम ठेवत दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशपिमध्ये विजय मिळवला आहे. मालदीवमध्ये यंदा खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळला 3-0 ने मात देत भारताने तब्बल 8 व्या वेळेस ही चॅम्पियनशिप जिंकली आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदं मिळवलेल्या भारतीय संघाने नेपाळविरुद्धच्या यंदाच्या फायनलमध्येही दुसऱ्या हाल्फमध्ये दमदार प्रदर्शन करत 3 गोल दागले.
संघासाठी पुन्हा एकदा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने कमालीचा खेळ दाखवला. सामन्यात त्यानेच पहिला गोल केला. त्यानंतर सुरेश वांगजम आणि सहल समदने एक-एक गोल केला. या सामन्यातील विजयामुळे भारताने 8 व्या वेळेस या स्पर्धेचं जेतेपद मिळवलं असून हे आतापर्यंतच्या स्पर्धांच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा मिळवलेलं जेतेपद आहे.
या स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने धिम्यागतीने केली. पण फायनलमध्ये भारताने नेपाळला 3-0 ने मात देत चॅम्पियनशिप जिंकली. स्पर्धेच्या सुरुवातीला बांग्लादेश आणि श्रीलंका यांसारख्या संघासोबत सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताने नेपाळ आणि मालदीव संघाविरुद्ध विजय प्राप्त करत फायनलमध्ये जागा मिळवली. फायनलमध्ये नेपाळला मात देत 2015 नंतर प्रथमच चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला.
या अंतिम सामन्यात भारताने 3 गोलने विजय मिळवला खरा पण पहिला आणि महत्त्वाचा गोल केला तो संघाचा स्टार खेळाडू सुनील छेत्रीनेच. त्याने 49 व्या मिनिटाला प्रीतम कोटाल्च्या पासवर गोल करत भारताला पहिली आघाडी मिळवून दिली. सोबतच त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 वा गोल करत महान खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सीच्या 80 गोलच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.