पुणे : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या तिस-या ( #INDvENG 3rd ODI )
आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती, मात्र नटराजनने अचूक गोलंदाजी करताना केवळ 6 धावा दिल्या आणि भारताने विजय साकार केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विजयासाठी 330 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला निर्धारित 50 षटकांमध्ये मध्ये 9 विकेट्स गमावून 322 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करनने 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 95 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. याव्यतिरिक्त डेव्हिड मलानने 50(50)अर्धशतकी तर लिविंगस्टोनने 36(36) धावांची खेळी केली.
भारतीय संघाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 3 फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली. तसेच टी नटराजनने 1 विकेट मिळवली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1504186769921023/
तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने सलामीवीर शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाचा डाव 48.2 षटकांत 329 धावसंख्येवरच आटोपला होता.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची शानदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीर जोडीने 103 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान धवनने अर्धशतक पूर्ण केलं. भारताची धावसंख्या 103 असताना रोहित शर्मा 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताची धावसंख्या 117 असताना धवन बाद झाला. धवनने 56 चेंडूत 10 चौकारांसह 67 धावा केल्या. दोन्हीही सलामीवीरांना आदिल रशीदने बाद केले.
त्यानंतर फलंदाजीस आलेला कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलही अपेक्षित कामगिरी करू शकले नाही आणि स्वस्तात बाद झाले. विराट आणि राहुलने प्रत्येकी 7 धावा केल्या. विराटला मोईन अलीने तर राहुलला लियाम लिव्हिंगस्टोनने बाद केले. त्यानंतर मधल्या फळीतील पडझडीनंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी 99 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 250 पार नेली. संघाची धावसंख्या 256 असताना पंत बाद झाला. पंतने 62 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या. पंतला सॅम करनने बाद केले.
त्यानंतर हार्दिक पंड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर हार्दिकला बेनस्टोक्सने त्रिफळाचित केलं. हार्दिकने 44 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. पंड्या बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 6 बाद 276 अशी होती. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 3 षटकार आणि एका चौकारासह झटपट 30 धावांची खेळी केली. शार्दुलंनतर कृणालही 25 धावांचे योगदान देऊन बाद झाला. मार्क वूडने या दोघांना बाद केले. दोघांनीही सातव्या विकेटसाठी 45 धावांची भागिदारी केली.
त्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज जास्त तग धरू शकले नाहीत. प्रसिध्द कृष्णाला मार्क वूडने शून्यावर आणि रीस टॉप्लेने भूवनेश्वर कुमारला 3 धावेवर बाद करत भारताचा डाव 48.2 षटकात 329 धावांवर संपुष्टात आणला.
इंग्लंडकडून मार्क वूडने 7 षटकांत 34 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले तर आदिल रशीदने 10 षटकांत 81 धावा देताना 2 गडी बाद केले. याव्यतिरिक्त सॅम करन, रीस टॉप्ले, बेन स्टोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.