नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विदेश मंत्री व संरक्षण मंत्री यांच्यात चर्चा झाली. दोन्ही देशांचे हे दोन मंत्री या चर्चेत एकत्र सहभागी झाल्याने या चर्चेला टू प्लस टू चर्चा असे संबोधले गेले. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेऊन अनेक विषयांवर दोन्ही देशांची भूमिका निश्चित करण्यात आली. ही चर्चा अत्यंत उपयुक्त झाल्याची माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विटरवर दिली.
या चर्चेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जयशंकर म्हणाले की, प्रत्येक संकटावेळी दोन्ही देशांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र आले होते.
आता अफगाणिस्तानातील अस्थिर स्थितीच्या बाबतीतही आम्ही एकत्र येऊन या अनुषंगानेही काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. भारत आणि ऑस्ट्रेलिया अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात एकमेकांचे भागीदार आहेत. भारताने अत्यंत कमी देशांशीच अशा प्रकारची टू प्लस टू ही चर्चा केली आहे, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.