चेन्नई – स्टीव्ह वॉच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य संघ वर्ष 2001 मध्ये भारतावर वर्चस्व गाजवायला आला होता. या मालिकेत मुंबई येथे झालेली पहिली कसोटी दहा विकेट्सने जिंकून ऑस्ट्रेलियाने दिमाखात मालिकेत आघाडी घेतली होती. कोलकता येथे झालेली दुसरी कसोटीही भारताच्या हातून जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, राहूल द्रविड (180) आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (281) दमदार फलंदाजीने फॉलोऑन मिळाल्यानंतरही भारताने हा सामना 171 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात हरभजनसिंगने नोंदवलेली हॅटट्रीक चर्चेचा विषय ठरली होती.
तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाल्याने 18 मार्च 2001 रोजी सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव वॉ याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मग सलामीवीर मॅथ्यु हेडनने 15 चौकार आणि सहा षटकारांसह 203 धावांची जोरदार खेळी केली. त्याला मार्क वॉने 70 आणि स्टीव्ह वॉने 47 धावा करत चांगली साथ दिली. मात्र कर्णधार वॉ चेंडू हाताळल्यामुळे स्वयंचित झाला. या तिघांव्यतिरिक्त फक्त जस्टीन लॅंगरला 35 धावा करता आल्या. रिकी पॉंटींगसह शेन वॉर्न, जेसन गिलेस्पी आणि कॉलीन मिलर यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 391 धावांत संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाला आपल्या फिरकीच्या जाळ्यात पकडण्यात भारतीय फिरकीचा समृद्ध वारसदार हरभजनसिंग भलातच फॉर्ममध्ये आला होता. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 391 मध्ये रोखण्यात त्याचा मोठा वाटा होता. हरभजनने 38.2 षटकांत 133 धावा देत तब्बल सात मोहरे टीपले होते. झहीर खान आणि पदार्पण करत असलेल्या साईराज बहुतुले या दोघांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली होती.
भारताने पहिल्या डावातच ऑस्ट्रेलियावर 110 धावांची आघाडी घेतली. “मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे शतक (15 चौकार, 2 षटकारांसह 126 धावा) उल्लेखनीय ठरलेच. शिवाय सलामीवीर शिवसुंदर दास (84), राहूल द्रविड (81), व्हीव्हीएस लक्ष्मण (65) आणि सदागोपन रमेश (61) अशी चौघांची मजबूत अर्धशतके झळकली. भारताने पहिल्या डावात 501 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्ग्राने 75 धावांत 3 तर कॉलीन मिलरने 160 धावांत तीन विकेट्स घेतल्या. गिलेस्पी आणि वॉर्नने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लडखडत 264 धावांपर्यंत गेला. त्यात मार्क वॉच्या 54, मायकेल स्लॅटरच्या 48, स्टीव्ह वॉच्या 47 तर मॅथ्यु हेडनच्या 35 धावा लक्षणीय ठरल्या. इथेही हरभजनसिंगच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाने लोटांगण घातले. हरभजनचा दरारा एवढा होता की, त्याचे गोलंदाजीचे पृथक्करण 41.5 षटके, 20 निर्धाव, 84 धावा आणि 8 विकेट्स! म्हणजेच हरभजनने एकाच कसोटीत 217 धावांत 15 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
आता भारतासमोर आव्हान होते 154 धावांचे आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी उत्कंठा इतकी पराकोटीला पोहोचली होती की सामना आणि मालिका कोण जिंकणार? दिवसभर सामन्याचे पारडे एकदा ऑस्ट्रेलियाच्या तर नंतर भारताच्या बाजूने झुकत होते. लक्ष्मणच्या 66, रमेशच्या 25 धावांनंतर भारताची सगळी मदार पदार्पण केलेल्या यष्टीरक्षक समीर दिघेवर आली होती. भारताचे सगळे दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते आणि मग समीर दिघेने हरभजनसिंगच्या साथीत किल्ला लढवत 22 धावा केल्या आणि अखेरीस विजयी धाव हरभजनने घेतली तेव्हा एक काव्यगत न्याय त्याला मिळाल्याची भावना व्यक्त झाली. मॅथ्यु हेडन आणि हरभजनसिंग संयुक्त सामनावीर ठरले तर हरभजनसिंग मालिकावीर.
फिरकीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर स्टीव्ह वॉने दुसऱ्या डावात शेन वॉर्नला सहाच षटके गोलंदाजी का दिली, हे कोणालाच उमगले नाही. पण भारताने ही मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखली, हे विशेष.