लंडन – सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी चहापानाच्या वेळेला खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 2 बाद 157 धावा केल्या आहेत.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी दिली. या आव्हानाचा लाभ घेत भारताच्या सलामीवीरांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा सावधपणे सामना केला. त्यातही रोहितने खेळपट्टीचा अंदाज आल्यावर चौफेर फटकेबाजी केली. सॅम कुरेनच्या एका षटकात तर रोहितने सलग चार चेंडूंवर चार चौकार फटकावताना अर्धशतकी पल्ला गाठला. या खेळीत रोहित अत्यंत आत्मविश्वासाने खेळत होता. त्याने शतकाकडेही कूच केली होती. मात्र, त्याचवेळी घात झाला.
इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रोहितचा बचाव भेदला व त्याचा 83 धावांवर त्रिफळा उडवला. रोहितने आपल्या खेळीत 145 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 1 षटकार फटकावला. बाद होण्यापूर्वी रोहितने राहुलच्या साथीत संघाला 126 धावांची सलामी दिली. रोहित व राहुल या जोडीने शतकी सलामी देताना 2017 सालानंतर इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत शतकी सलामी दिली.
या जोडीने जेव्हा अर्धशतकी सलामी पार केली तेव्हा भारतीय संघाकडून तब्बल 69 वर्षांनी लॉर्डसवर अर्धशतकी सलामी दिली गेली. रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा यानेही पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 23 चेंडूत 9 धावा काढून तंबूचा रस्ता धरला. त्यालाही अँडरसननेच जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. दरम्यान राहुलने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या नाबाद 55 धावांच्या खेळीत 143 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा राहुल 55 तर कर्णधार कोहली 0 धावा काढून नाबाद होते.
पहिल्या कसोटीप्रमाणे याही कसोटीवर पावसाचे सावट निर्माण झाले. सकाळीच पावसाला प्रारंभ झाल्यामुळे नाणेफेक उशिरा झाली. त्यानंतरही डाव सुरु झाल्यावरही पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, त्यानंतर खेळ सुरुळीतपणे सुरु झाला. भारताने या सामन्यात दुखापतग्रस्त शार्दुल ठाकुरच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संधी दिली. पहिल्या कसोटी सामन्यातील विजय भारताच्या हातून पावसाने हिरावून नेला होता. त्यामुळे मालिकेत अद्याप कोणत्याही संघाला आघाडी नाही. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 52 षटकांत 2 बाद 157 धावा. (रोहित शर्मा 83, लोकेश राहुल खेळत आहे 55, विराट कोहली खेळत आहे 0, जेम्स अँडरसन 2-28).