नवी दिल्ली – भारत आणि चीन सीमेवर तणाव कायम असताना प्रत्यक्ष ताबारेषेवर भारताने ब्रम्होस, निर्भय आणि आकाश ही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीनने क्षेपणास्त्र तैनात केल्याचे स्पष्ट होताच भारताने ही तातडीने कार्यवाही केली.
निर्भय क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असून त्याचा पल्ला एक हजार किमीचा आहे. जमीनीवरील सखल भागात मारा करण्याची क्षमता हे त्याचे खास वैशिष्ठ्य. जमिनीवरून 100 मिटर ते चार किमी उंचीवरून ते लक्ष्याचा वेध घेऊ शकते. हे क्षेपणास्त्र डिआरडीओने विकसीत केले आहे. त्याचा पल्ला पाहिला असता ते तिबेटमधीलचीनी तळांनादेखील लक्ष्य बनवू शकते.
चीनची क्षेपणास्त्रे
चीनने जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे चीनने तिबेटमध्ये तैनात केल्याचे उपग्रहांवरील छायाचित्रांद्वारे स्पष्ट होत आहे. ही क्षेपणास्त्रे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्येही तैनात केली आहेत. या उपग्रहांची माऱ्याची क्षमता दोन हजार किमी आहे.
चीनच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने 500 किमी क्षमता असणारे ब्रम्होस आणि जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या आकाश क्षेपणास्त्रेही तैनात करण्यात आली आहेत. ब्रम्होस हेच चीन वरूध्दच्या युध्दात भारताचे महत्वाचे अस्त्र असेल, असे मानले जाते. ते पुरेषा संख्येने तैनात करण्यात आल्याचे हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. चीनी लष्कराच्या शिनजिआंग आणि तिबेट प्रांतातील तळ उद्ध्वस्त करण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र सुखोई विमानातूनही डागता येऊ शकते.
चीनच्या हवाई दलाला रोखण्यासाठी आकाश क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले आहे. आकाश एकावेळी 64 लक्ष्य वेधू शकते. त्यातील 12 लक्ष्यांना एकावेळी गाठू शकते.