नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन्ही देशांच्या सीमेवर सैन्य आणि शस्त्र तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीमध्ये चीनच्या आक्रमक कारवायांचा ‘अतिशय अनुरूप रीतीने’ सामना करण्यास भारताची सशस्त्र दले सक्षम आहेत, असे प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले आहे.
पूर्व लडाखच्या काही भागांमधील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न चीन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे वक्तव्य केले आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे. भारताच्या वचनबद्धतेच्या धोरणाला विश्वासार्ह लष्करी ताकद आणि क्षेत्रीय प्रभाव यांचा पाठिंबा नसेल, तर त्याचा अर्थ चीनच्या या क्षेत्रातील वर्चस्व मान्य केल्यासारखा होईल,असे यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या संवादात्मक सत्रात बोलताना जनरल रावत म्हणाले. अतिशय गुंतागुंतीचे धोके आणि आण्विक ते पारंपरिक अशा व्यापक परिघातील संघर्षांची आव्हाने भारतापुढे आहेत, मात्र आमची सशस्त्रे दले ती पेलण्यास तयार आहेत, असे माजी लष्करप्रमुखांनी सांगितले.
अलीकडच्या काळात चीनच्या काही आक्रमक कारवाया भारताच्या नजरेला पडत आहेत, मात्र त्यांना अतिशय अनुरूप रीतीने तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत, असे जनरल रावत यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या भांडणाचा फायदा घेण्याचा दु:साहस करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, तर त्या देशाला प्रचंड नुकसान सोसावे लागेल, असा परखड इशाराही जनरल रावत यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला.