नॉर्थ साऊंड – डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारत “अ’ संघाने वेस्ट इंडिज “अ’ संघाचा सहा गडी राखून दणदणीत पराभव करत मालिकेची विजयी सुरूवात केली.
अखेरच्या दिवशी भारत “अ’ संघसमोर विजयासाठी 97 धावांचे आव्हान होते. भारताकडून अभिमन्यू ईश्वरन याने 27 धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर कर्णधार हनुमा विहारीने आणि श्रीकार भरत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारत “अ’ संघाला विजय सहज साकारता आला. 3 बाद 159 अशी दमदार मजल मारणाऱ्या वेस्ट इंडिज “अ’ संघाचा डाव शुक्रवारी फक्त 180 धावांतच गुंडाळला. नदीमने 21 षटकांत 47 धावांत पाच बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तर मोहम्मद सिराजने 38 धावा देत 3 गडी बाद केले. या सामन्यात नदीमने 109 धावांच्या मोबदल्यात 10 गडी बाद केले.
भारत “अ’ संघाने 8 बाद 299 या धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु 104.3 षटकांत भारताला 312 धावांपर्यंतच मजल मारता आली. यावेळी यष्टीरक्षक वृद्धीमान सहाने 66 धावांची खेळी साकारली. त्यामुळे पहिल्या डावात 84 धावांनी पिछाडीवर पडलेल्या वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात 180 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार शामार ब्रुक्सने 53 धावा केल्या, तर रोस्टन चेसने 32 त्याच्यासोबत तिसऱ्या विकेट्ससाठी 79 धावांची भागीदारी केली.