नॉर्थ साऊंड, अँटिग्वा – वेस्ट इंडिज ‘अ’ विरूद्ध आजपासून येथे होणाऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत “अ’ संघाचे पारडे जड राहील अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक रिद्धीमान साह याला महेंद्रसिंगचा वारसदार सिद्ध करण्यासाठी हुकमी संधी मिळणार आहे.
भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज “अ’ विरूद्ध झालेल्या एक दिवसीय पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविला आहे. त्याचा फायदा त्यांना कसोटी सामन्यात मिळेल असा अंदाज आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उतरला आहे. या संघातील शुभमन गिल, हनुमा विहारी के.गौतम, रिद्धीमान साह यांच्यावर फलंदाजीची मदार आहे. प्रियांक पांचाळ व अभिमन्यु ईश्वरन या सलामीची जोडीवर भक्कम पाया रचण्याची जबाबदारी राहणार आहे. शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व आवेश खान यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे.
वरिष्ठ संघात स्थान न मिळाल्यामुळे मी निराश झालो आहे. भारत ‘अ’ संधाकडून खेळताना मी येथे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे माझी निवड होईल अशी खात्री होती असे गिलने सांगितले. तो पुढे म्हणाला की, अर्थात येथील आगामी सामन्यांमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा मी प्रयत्न करणार आहे.