नवी दिल्ली – मागील साडेतीन वर्षांत भारताला भूकंपाचे तब्बल 932 धक्के बसले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 1.8 ते 6.6 इतकी नोंदली गेली. 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2019 या कालावधीत ते भूकंप झाले.
याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. प्रामुख्याने मणिपूर आणि अंदमान-निकोबार बेटांना 6 पेक्षा अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. इतर धक्के कमी तीव्रतेचे होते, असे त्यांनी नमूद केले. भूकंपानंतरच्या स्थितीची हाताळणी करण्यासाठी असलेल्या देशाच्या सज्जतेबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, सामान्य जनता आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्यांच्या संबंधित यंत्रणांकडून विविध पाऊले उचलली जातात.
त्याअंतर्गत भूकंपाचे परिणाम आणि हानी कमी होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतची माहिती दिली जाते. जीवित आणि वित्तहानीचे प्रमाण कमी राहण्याच्या उद्देशातून घरांच्या रचनेबाबत विविध यंत्रणांकडून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.