नवी दिल्ली – देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आज 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 40 लाख रुग्ण संख्येवरून हा आकडा 50 लाखांवर जाण्यास केवळ अकरा दिवस लागले आहेत.
गेल्या 24 तासांत करोनाचे 90 हजार 123 रुग्ण आढळून आल्याने देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 50 लाख 20 हजार 359 वर गेली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात करोनाची लागण होण्याचा वेग तुलनेने कमी होता पण आता तो कमालीचा वाढला असल्याचे सदर आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. चाचण्यांची संख्या जशी वाढत आहे तसे करोना रुग्णांचेही प्रमाण वाढत असल्याचेही दिसून आले आहे.
दरम्यान, देशभरात काल एका दिवसांत 1290 करोनाग्रस्त रुग्णांचे निधन झाले असून त्यातील 515 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि आंध्र प्रदेशचा नंबर लागतो. देशभरात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 82 हजार 66 इतकी झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.