मुंबई – जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि वाढलेल्या महागाईमुळे गेल्या पाच दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांकात कोसळत होते. मात्र आज काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 574 अंकांनी वाढून 57,037 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकनिफ्टी 177 अंकांनी म्हणजे 1.05 टक्क्यांनी वाढून 17,136 अंकांवर बंद झाला.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी गेल्या आठवड्यात सपाटून मार खाल्ला होता. आज या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतात विक्री करीत असले तरी ही तूट देशातील संस्थागत गुंतवणूकदार भरून काढण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे निर्देशांक वाढण्यास मदत मिळाली.
अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एअरटेल, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली. मात्र बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांनी आजही विक्रीचा मारा सहन केला.
गेल्या पाच दिवसात सेन्सेक्स 2,984 अंकांनी तर निफ्टी 825 अंकांनी कमी झाला होता. युद्धामुळे जागतिक बाजारातून आजही संमिश्र संकेत आले. मात्र भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांत बरीच विक्री झाल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांक वाढल्याचे त्यांनी सांगितले.