पुणे -चित्रपट हे एक सर्जनशील क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या यशाचे स्वत:चे नियम असून, याची स्वतंत्र आणि वेगळी शैली आहे. यशस्वी चित्रपटाचे कोणतेही ठरलेले सूत्र नसते, असे मत हिंदी चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) वतीने ऑनलाइन संवाद सत्राचे आयोजन केले होते. इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी चित्रपटांचा प्रवास उलगडला. यावेळी एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर उपस्थित होते. हिरानी यांनी विद्यार्थी असतानाचे अनुभव, चित्रपट क्षेत्रातील संघर्ष, दिग्दर्शनाचे पैलू, स्टाइल आदीसह त्यांच्या मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स आदी चित्रपटांतील किस्से सांगितले.