महाबळेश्वर – पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शासनानेही केवळ हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंत तोकडी असल्याने सोमवारी महाबळेश्वर येथे शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढत एकरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना तसे निवेदनही सादर करण्यात आले आहे. यावर्षी अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकरी वर्गाचे हाती आलेले पीक वाया गेले, अतिवृष्टीने त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे. पीक काढणीला आले असतानाच पावसाने हाहाकार माजविला व शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली. पावसामुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून शासनाने एकरी आठ हजारांची मदत जाहीर करून पंचनामे सुरू केले.
परंतु ही मदत कमी असल्याने एकरी 25 हजार रूपये मिळावेत अशी मागणी राज्यात सर्व स्तरातून केली जात होती. परंतु या मागणीची दखल कोणी घेत नसल्याने सोमवारी शिवसेनेच्यावतीने माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर व माजी सभापती धोंडीराम बापु जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख संजय शेलार, संतोष जाधव, राजेश गुजर, महिला आघाडी प्रमुख वनिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचनामा करणारे तलाठी यांनी काही ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले. पंरतु काही गावात मात्र केवळ भात पिकाच्याच नुकसानीचे पंचनामे केले. त्या गावातील स्ट्रॉबेरी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी यावेळी मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केली. यावेळी हरिष जाधव, राजश्री भिसे, गणेश सपकाळ, अरूण शेलार, संदीप मोरे, राजेश शेलार, राजेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.