रेडा – वडापुरी (ता. इंदापूर) येथील पाझर तलाव गेल्या दोन वर्षांपासून कोरडे पडल्याने पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. घोटभर पाणी मिळावे, याकरीता पाझर तलावात पाणी सोडवे, अशी मागणी करीत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी या महिला तहसिलदारांकडे गेल्या होत्या. परंतु, तहसिदारांनी निवेदन स्विकारण्यासाठी जागेवरून उठण्याचीही तसदी घेतली नाही. यामुळे आमची व्यथा मॅडमसाहेबांना काय कळणार, अशा शब्दांत वडापुरीतील महिलांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
वडापुरी येथील तलावात पाणी नसल्याने परिसरातील विहीरी आटल्या आहेत. नद्यांना पूर आलेला असताना तसेच भर पावसाळ्यात येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी ग्रामस्थांचे तसेच जनावरांचेही हाल होत आहेत. याकामी कोणतीही राजकीय व्यक्ती लक्ष देत नसल्याने अखेर 65 महिलांनी पाण्याचे गाऱ्हाणे मांडण्याकरीता इंदापूर तहसील कार्यालय गाठले.
वडापुरी येथील पाझर तलावात पाणी नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून आमचे हाल होत आहेत, पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडावे, अशी मागणी केलेले निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्याकरीता या महिला त्यांच्या कार्यालयात गेल्या. काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी हे निवेदन त्यांच्यापुढे सरकवले. परंतु, कष्टकरी महिलांकडून निवेदन स्वीकारण्यासाठी तहसिलदार जागेवर उठल्याही नाहीत. उपोषणकर्ते, आंदोलक आदींकडून शासकीय प्रतिनिधी म्हणून निवेदन स्विकारणे, याकरीता सौजन्यपूर्वक प्रयत्न करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु, वडापुरातील त्रस्त महिलांकडून निवेदन स्विकारताना याचा विसर तहसिलदार मेटकरी यांना पडला असावा, अशीच प्रतिक्रिया समोर येत आहे.
यावेळी अंबिका बागल, विठ्ठल कदम, मनीषा माने, सुरेखा माने, बिस्मिला शेख, मंदाकिनी सावंत, हसीना शेख, वंदना कासार उपस्थित होत्या. या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभागालाही देण्यात आली आहे.
गावातील पाणीटंचाईचा प्रश्न तहसीलदारांनी गांभीर्यपूर्वक सोडविला नाही. तसेच शासनापर्यंत ही बाब पोहचविली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयसमोर गावातील सर्व महिला उपोषणाला बसणार आहोत.
-समस्त महिला, वडापुरी गाव