नवी दिल्ली – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना पार पडला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सने पराभव केला. भारताने आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. यावेळी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताने पहिला सामना 68 धावांनी जिंकला होता.
दुसऱ्या सामन्यात भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 164 धावा केल्या. भारताने हे लक्ष्य 19 व्या षटकात तीन विकेट्स गमावून पूर्ण केले. यावेळी टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनी शानदार खेळी केली.
विंडीजने चांगली धावसंख्या उभारली
यावेळी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विंडीजचा सलामीवीर ब्रेंडन किंग आणि काइल मेयर्स यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केल्याने रोहितचा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरला. किंगने 20 आणि काइल मेयर्सने 73 धावा केल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार पूरनने 22 धावांची खेळी खेळली.
संघाकडून रोव्हमन पॉवेलने 23 आणि शिमरॉन हेटमायरने 20 धावा केल्या. या दोघांच्या छोट्या आणि महत्त्वाच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने 164 धावांची संघर्षपूर्ण धावसंख्या उभारली. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने 2 बळी घेतले. दुसरीकडे अर्शदीप आणि हार्दिक पांड्याने 1-1 विकेट घेतली. खेळपट्टी पाहता विंडीजची ही धावसंख्या चांगली दिसत होती.
भारताचा शानदार विजय
सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी संघाची धुरा सांभाळत 105 धावांची शानदार भागीदारी केली. सूर्यकमार यादवने 44 चेंडूत शानदार 76 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 24 धावांची खेळी खेळली. पंड्या 4 धावा करून बाद झाला. शेवटी पंतने 26 चेंडूत 33 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दीपक हुडाही 10 धावांवर नाबाद राहिला. आता पुढील चौथा आणि पाचवा टी20 सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे.