जोहान्सबर्ग – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज बनला आहे. गेल्या तब्बल तीन दशकांत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, हीच नामी संधी कोहलीच्या संघाला मिळाली आहे.
ही कसोटी येथील प्रसिद्ध वॉंडरर्स मैदानावर खेळवली जाणार आहे. या मैदानाचा इतिहास भारतीय संघाच्या बाजूने आहे. आजवर या मैदानावर भारताने एकही सामना गमावलेला नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर यजमानांच्या फलंदाजांना पूर्ण अपयश आले. मात्र, पहिल्या डावात भारतीय संघाने घेतलेली आघाडीच निर्णायक ठरली. या सामन्यात लोकेश राहुल व मयंक आग्रवाल यांनी जबाबदारीने फलंदाजी केली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने देखील जबाबदार खेळी केली मात्र, अद्याप भारतीय संघाला चेतेश्वर पुजारा, कर्णधार कोहली, ऋषभ पंत यांच्याकडून जास्त सरस कामगिरीची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेची अननुभवी फलंदाजी पाहता केवळ डीन एल्गरलाच लवकरात लवकर बाद करण्यासाठी भारताच्या गोलंदाजांना काही योजना तयार करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही करावी लागणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखायचे असेल तर भारताच्या फलंदाजांना कागिसो रबाडा व लुंगी एन्जीडी यांच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.