IND vs NZ – टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आज मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याअगोदर मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांना चांगली साथ अशी अपेक्षा होती. मात्र, रोहितचा गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला आणि भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना झटपट बाद केले. पाहुणा संघ अवघ्या ३५ षटकांच्या आत १०८ धावांवरच सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आले नाही.
भारताकडून मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी केली. त्याने ६ षटके गोलंदाजी करत १८ धावा खर्च करून ३ गड्यांना तंबूत पाठवले. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तसेच सिराज, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे आता भारताला सामन्यासह मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी १०९ धावांची आवश्यकता आहे. महत्वाचं म्हणजे पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या चुका या सामन्यात टाळल्या. सिराजनंतर शमीनेही आपल्या वेगवान गोलंदाजीतील चमक दाखवली.
भारतीय संघाने आगामी काळात होणाऱ्या एकदिवस विश्वचषकाच्या दिशेने दमदार सुरुवात केली आहे. अगोदर श्रीलंका आणि आता न्यूझीलंडविरुद्धही भारताने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारताला आता आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद खुणावत असल्याचे चित्र दिसत आहे. वेगवान गोलंदाजांची कामगिरी भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिराजच्या कामगिरीवर सर्वांच्याच नजरा राहणार आहेत.