लंडन – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ यजमान संघाशी मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
येत्या गुरुवारपासून इंग्लंड व भारत यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड पहिल्या टी-20 सामन्यात संघासोबत नसणार आहे. त्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत. या पहिल्या टी-20 सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह व ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे.
जून महिन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा दौरा केला होता व त्यात दोन टी-20 सामन्यांची मालिकाही जिंकली होती. त्या दौऱ्यावर लक्ष्मण हेच प्रशिक्षक होते. या मालिकेत करोनातून पूर्ण बरा झालेला नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळणार आहे.