नवी दिल्ली – दिल्लीत प्रदूषणामुळे ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर करण्यात आली आहे. भारत-बांग्लादेशमधील
सामना हा इतर ठिकाणी घ्यावा या पर्यावरणवाद्यांंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी दोन्ही संघ आज होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. आज सायंकाळी 7 वाजता अरूम जेटली स्टेडियमवर हा टी-20 चा पहिला सामना होणार आहे.
दरम्यान, दिल्लीतील प्रदूषणामुळे या सामन्यासंदर्भात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेक जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. बांग्लादेश संघानेही याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली, तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच.
ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी भारताला जवळपास २० सामने खेळायचे असून, याद्वारे समतोल संघ तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. या पाश्र्वभूमीवर अनेक पर्याय हाताळणे महत्त्वाचे ठरेल.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.
बांग्लादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.