मुंबई – सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील पंचांच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरून पंचांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट केली होती. तर, बंगळुरू आणि मुंबईदरम्यान झालेल्या सामन्यात लसिथ मालिंगाचा नो बॉल पंचांनी योग्य बॉल ठरवला होता. त्या संदर्भात मुंबई इंडियन्सचा संचालक (क्रिकेट) झहीर खानने आपले मत मांडत्याना सांगितले की, पंचांवर जेवढे दडपण येईल तेवढी परिस्थिती कठीण बनत जाईल.
या विषयी बोलताना झहीर म्हणाला की, अनेक गोष्टींमध्ये आता सुधारणा झाली आहे आणि सुधारणेला अजूनही वाव आहे. पण जेव्हा आपण पंचांच्या कामगिरीचा दर्जा पाहतो तेव्हा एक लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांचे काम सोपे नाही. जेवढे ओझे त्यांच्यावर टाकले जाईल तेवढेच ते काम अधिक कठीण होत जाईल.