धोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून परवडणाऱ्या घरांच्या योजनांना वेग आला आहे. असे असले तरी लक्झरी हौसिंग सेक्टरमध्ये देखील तेजीचे वातावरण असून अशा घरांना मागणी वाढल्याचे चित्र आहे.
रिअल इस्टेटमध्ये गेल्या तीन चार वर्षापासून सुस्ती दिसते. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी, बॅंकांच्या एनपीएत वाढ, एनबीएफसीची बिघडलेली स्थिती आदींचा परिणाम रिअल इस्टेटवर झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिसेल बाजाराबरोबरच आलिशान घराच्या सेगमेंटला देखील मोठा धक्का बसला. परिणामी लक्झरी हौसिंगच्या विक्रीत कमालीची घसरण झाली होती.
वास्तविक लक्झरी होमच्या क्षेत्रात दोन वर्षे शुकशुकाट होता. म्हणूनच विकासकांनी आलिशान फ्लॅटच्या निर्मितीत आखडता हात घेतला होता. ग्राहकांकडून कमी किंमतीतील कोझी आणि परवडणाऱ्या घरांना पसंती दिली जात होती. मात्र पुन्हा एकदा ग्राहकांनी लक्झरी होम सेगमेंटमध्ये रुची दाखवण्यास सुरवात केली आहे.
एनरॉकच्या नवीन आकडेवारीनुसार स्वस्त आणि मध्यम श्रेणीतील हौसिंग सेगमेंटमध्ये सध्यातरी फारसे समाधानकारक चित्र नाही, मात्र लक्झरी घरांनी विक्रीत वेग पकडला आहे आणि तोही विक्रमी रितीने. एनरॉक प्रॉपर्टीज कन्सल्टंटचे अध्यक्ष अनुज पूरी यांच्या मते देशभरातील प्रमुख सात शहरातील एकूण दीड कोटी रुपये किंमतीचे आलिशान श्रेणीतील 16,100 घरांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर 2017 मध्ये केवळ 5240 घरे लॉंच झाली. त्यातुलनेत आजची आकडेवारी समाधानकारक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास नोटाबंदीनंतर आलिशान घरांच्या वितरणात प्रभावीपणे वाढ झाल्याचे चित्र आहे. 2018 च्या पहिल्या सहा महिन्यांनंतर मागील वर्षाच्या समकालीन काळाच्या तुलनेत 40 टक्के वाढ झाली आहे.
2019 च्या पहिल्या सहा महिन्यात आलिशान घर ताब्यात देण्याच्या प्रकरणात मुंबईची एमएमआर आणि दिल्ली एनसीआर आघाडीवर राहिले. हे प्रमाण देशातील सात शहरातील घरांच्या ताबा देण्याच्या तुलनेत 59 टक्के राहिले आहे.
लोकांचे राहणीमान उंचावत असून उत्पन्न देखील वाढले आहे. त्यामुळे गुंतवणुकीबरोबरच आरामदायी जीवनशैलीचा विचार केला जात असल्याने या सेगमेंटध्ये विक्री वाढली आहे. भारताची लोकसंख्या सतत वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणीमान भारतात विकसित होत असून त्याचे प्रतिबिंबही आपल्याला दिल्ली, मुंबई, बंगळूर, पुण्यात पाहवयास मिळते. अत्याधुनिक सोयीसुविधांनी घर सुसज्ज असावे, अशी मानसिकता नागरिकांची झाली आहे.
म्हणूनच महागड्या घरांचा विचार केला जात आहे. एनआरआय देखील रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये मागणी असून ती वाढतच चालली आहे. अशा स्थितीत देशातील सामान्य नागरिक परवडणाऱ्या घरांचा विचार करतात.
परंतु सामान्य किंवा उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील ग्राहकांचा ट्रेंड बदलत चालला आहे. ही मंडळी कोणत्या ना कोणत्या कारणाने देश-विदेशात खूप प्रवास करतात आणि आलिशान घराच्या खरेदीबाबत सकारात्मक राहत असल्याचे दिसून येत आहे. ही सकारात्मकता आलिशान घरांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
– कमलेश गिरी