अमोल मतकर
राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा
संगमनेर – एकीकडे जिल्हा प्रशासन अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत असताना अवैध धंद्यावाल्यांना राजकीय वरदहस्त लाभला असल्याने त्यांचे चांगलेच फावले जात आहे. आता तर थेट सर्वसामान्य नागरिकांवर मुजोरी करत त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव संगमनेर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
संगमनेरमधून प्रवरा, मुळा, आढळा आणि म्हाळुंगी नद्या वाहतात. या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू तयार असल्याने उपसा होतोय. त्यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. वाळू चोरीत अल्पवयीन मुले, तरुण जास्त प्रमाणात आहे. वाळू उपसा करून ती रिक्षा, गाढव, टेम्पो, पिकअप, डंपरमधून बिनदिक्कतपणे विना परवाना वाहतूक करतात. मात्र, अवैध वाहतूक करताना सर्वसामान्य जनतेला अडथळा निर्माण करून त्यांच्या जिवाशी खेळत आहेत. संगमनेर खुर्द परिसरात प्रवरा नदी तीरावर नगरपरिषदेने दशक्रिया विधीसाठी ओटा बांधला आहे. तेथे दशक्रियेवेळी हजारो लोक येतात.
परंतु एवढ्या मोठ्या गर्दीतही हे मुजोर वाळूतस्कर त्यांच्यासमोर वाळूचा उपसा करतात. दिवसाढवळ्या चालणारा हा गोरखधंदा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असलेले आर्थिक हितसंबंध आणि राजकीय वरदहस्ताच्या जिवावर चालत असल्याचा सूर नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे हे वाळूमाफिया पुणे, नाशिक व मुंबई येथून कालबाह्य ठरलेल्या रिक्षा विकत घेऊन वाळू वाहतुकीसाठी वापर करतात. भरधाव वेगाने वाळूची वाहने चालवून थेट पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर घालण्याचे धाडस ते आता करू लागले आहेत.
असाच प्रसंग संगमनेरातील एका नागरिकाच्या बाबतीत घडला आहे. त्या नागरिकाची पत्नी संगमनेर खुर्द येथे एका खाजगी संस्थेमध्ये कामाला असल्याकारणाने तिला सोडविण्यासाठी चंद्रशेखर चौकातून संगमनेर खुर्द येथे जात असताना प्रवरा नदीवरील छोट्या पुलाच्या अगोदर एक रिक्षावाला वेगाने नदीतून वाळू भरून घेऊन आला असता त्या नागरिकाच्या दुचाकीला कट मारला.
त्यामुळे दुचाकीस्वाराचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो हेलकावला गेला. त्याने त्याच्या पत्नीला कामावर सोडवून परत येत असताना जेथे दशक्रियाविधी पार पडतात त्या ठिकाणावर जाऊन गर्दीमध्ये उभे राहून आपल्या मोबाईलमध्ये या गोरखधंद्याचे चित्रण केले आणि झालेली हकीकत समाजमाध्यमावर प्रसिध्द केले.
त्यानंतर तर थेट एका स्थानिक नगरसेवकाचा दूरध्वनी त्याला आला. गरिबांना पोट भरू दे… तू जे फेसबुकला टाकले ते डिलीट कर नाही तर जड जाईल, आता सत्ता आमची आहे, अशी धमकी दिली. प्रशासनाकडून अनेकदा अवैध वाळूच्या गाड्या पकडल्या जातात. मात्र वाळूमाफियांना राजकीय वरदहस्त असल्याने नेत्यांचे त्यांना सोडण्याबाबत फोन येतात. तसेच प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचेही या वाळूमाफियांबरोबर साटेलोटे उघडपणे बोलले जाते. त्यामुळे या वाळूमाफियांचा बिमोड करण्याची मागणी होत आहे.
तहसील परिसरात वाळूमाफियांचा वावर
तहसील परिसरात काही वाळूमाफियांचा सतत वावर असून त्यांची बऱ्याच अधिकाऱ्यांकडे उठबैस असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. वाळूवाहतूक करणाऱ्या भरधाव वेगाने रिक्षा चालवणारांमुळे नागरिक धास्तावले आहेत. परंतु त्यांना मिळणाऱ्या राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कधी कारवाई होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.