प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उद्योगांवर परिणाम
नवी दिल्ली – लॉकडाऊननंतर विविध वस्तूंची तस्करी वाढू लागली आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक उद्योगांवर परिणाम होत आहे.
अगोदरच क्रयशक्ती कमी झालेल्या नागरिकांकडून वस्तूसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सरकारने सावध होऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. वाढलेल्या तस्करीच्या प्रकाराकडे उद्योजकाची संघटना असलेल्या फिक्कीचे लक्ष आहे. यासाठी एक वेगळा विभाग निर्माण केला आहे. या विभागाच्या अध्यक्षपदी अनिल राजपूत आहेत.
विभागाने जारी केलेल्या पत्रकात तस्करी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुरुवातीच्या काळात सिगारेट, मद्य, तंबाखू हे पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसल्यामुळे या पदार्थांची तस्करी झाली. वाहतुकीचा प्रश्न आणि इतर कारणांमुळे इतर वस्तूही गरजेपेक्षा जास्त भावाने विकल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांची पिळवणूक आणि गैरसोय होत आहे. एखादी असामान्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या परिस्थितीचा गैरफायदा कसा घ्यायचा याच्या नावीन्यपूर्ण योजना तस्कर आणि त्यांच्या पाठीराख्यांकडून तयार केल्या जातात. त्यामुळे समाजव्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो, असे राजपूत यांनी सांगितले.
परवा केरळमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली रेल्वेस्थानकावर सिगारेटचा साठा आढळून आला. मुंबई हैदराबादमधूनही अशा घटनांचे वृत्त आहे. याचा अर्थ देशभरात अशा प्रकारचा घटना घडत आहेत. सध्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत वस्तू जास्त भावाने विकण्याचे प्रमाण वाढले आहे.
महसुलावर परिणाम
अगोदरच व्यवहार कमी झाल्यामुळे कर संकलनावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत तस्करी वाढल्यानंतर सरकारच्या महसुलावर जास्तच परिणाम होतो. विशेष म्हणजे वस्तूसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात तर दुसरीकडे सरकारला कर मिळत नाही.
तस्करी म्हणजे राष्ट्रहिताला धोका
तस्करी म्हणजे राष्ट्रहिताला धोका समजण्याची गरज आहे. कारण यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होत असतो. यासाठी या गैरप्रकाराला राष्ट्रीय धोका संदेश संबोधून परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे राजपूत म्हणाले. यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेला तडा बसतो.