तीन माजी संमेलनाध्यक्षांचे पंतप्रधानांना साकडे
पिंपरी – केंद्र सरकारने कार्यालयीन भाषेत अर्थात प्रमाण हिंदीमध्ये “ळ’ हा वर्ण समाविष्ट केला आहे. तरी, या वर्णाचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये व विभाग (रेल्वे, टपाल, बॅंका) येथे त्वरीत करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी तीन अध्यक्षांसह विविध साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नामकरण उर्दू आणि उत्तर भारतातील हिंदीमध्ये “तिलक’ असे झाले आहे. मात्र, हिंदी समूहाच्या विविध लोकभाषांमध्येच “ळ’ चा उच्चार असल्याने आणि केंद्र सरकारच्या कार्यालयीन हिंदीतही तो आता त्यांच्या वर्णमालेत समाविष्ट केला आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक यांचे हिंदीमध्ये “तिलक’ असे नामकरण करण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचा मुद्दा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख अशा तीन माजी संमेलनाध्यक्षांनी उपस्थित केला आहे.
त्याशिवाय लेखक संजय जोशी, सुनील महाजन यांनीही हीच मागणी लावून धरली आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. तसेच, राजन खान, प्रदीप निफाडकर, रा. रं. बोराडे, किशोर सानप, रविंद्र शोभणे, विजया वाड, भारत सासणे, श्रीकांत बोजेवार, प्रतिमा इंगोले अशा 18 साहित्यिकांनी देखील या मागणीला ऑनलाइन सहमती दर्शविली आहे, अशी माहिती साहित्यिक प्रकाश निर्मळ यांनी दिली.
पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात साहित्यिकांनी नमूद केले आहे की, केंद्र सरकारने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सर्व हिंदी साहित्य, परिपत्रके, नामपट्टीका आदींमध्ये “तिलक’ असे झालेले नामांतर मागे घेण्याच्या सूचना जारी कराव्यात. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसची हिंदीतील नामपट्टीका त्यांच्या मुळ नावानुसार पूर्ववत करून घ्यावी. रेल्वेप्रमाणेच महामार्ग विभाग, विमानतळे, टपाल कार्यालये, बॅंका व वित्तीय संस्था, आयकर कार्यालये, गृह व संरक्षण विभागाची कार्यालये, न्यायपालिका आदी सर्व ठिकाणी मूलत: “ळ’ उच्चार असलेली स्थान अथवा व्यक्ती नामे असल्यास आणि तिथे “ळ’ ऐवजी दुसरा वर्ण वापरला गेला असल्यास नव्याने दुरूस्ती करून घ्यावी.
देशातील ज्या व्यक्ती, स्थानांच्या नावात “ळ’ अथवा तत्सम उच्चार आहे, त्यांचे प्रमाण हिंदीत लेखन करताना ते कोणताही अपवाद न करता “ळ’ असेच करावे. ल, झ, ष, र अशा पर्यायी वर्णाचा वापर करू नये. आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य ती कायदेशीर तरतूद करून घ्यावी. या नियमांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेतली जावी.