पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केले सूतोवाच
बॅंकॉक: भारताचे पूर्वेकडच्या राष्ट्रांसाठीचे धोरण हे इंडो-पॅसिफिक दृष्टीकोनाचा महत्त्वाचा भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज बॅकॉक इथे 16व्या भारत आसियान परिषदेत बोलत होते. एकात्मिक, सुसंघटित आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आसियान भारताच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तसेच भारत जमीन, सागरी आणि हवाई संपर्काव्यतिरिक्त डिजीटल माध्यमातूनही परस्पर सहकार्यात वाढ करण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रत्यक्ष आणि डिजिटल संपर्कयंत्रणा सुधारण्यासाठी भारताने दिलेल्या एक अब्ज डॉलर्सचा कर्जाचा उपयोग होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी झालेल्या आसियान शिखर परिषदेचा आणि सिंगापूर येथे झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदेचा त्यांनी उल्लेख केला. या परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे भारत आणि आसियान राष्ट्रे अधिक जवळ आली आहेत. ही भागीदारी अधिक दृढ करत परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी भारत इच्छुक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विशेषतः कृषी, संशोधन, अभियांत्रिकी, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधानानी दिली.
सागरी सुरक्षा आणि नील अर्थव्यवस्था या क्षेत्रात भारताला आसियान देशांशी अधिक मजबूत सहकार्य आणि संबंध हवे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारत-आसियान एफटीएचा आढावा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करत यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी वृद्धींगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वृद्धींगत करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, असे पंतप्रधानानी म्हटले आहे.