अनिल मेहेर : आंबिया बहार फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात 5 हजार एकराहून अधिक क्षेत्र हे द्राक्ष पिकाखाली असून, द्राक्ष बागांचे शंभर टक्के नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत. 2017-2018 आणि 2018-19 या आर्थिक वर्षात आंबिया बहार फळ पीक विमा योजनेंतर्गत द्राक्ष पिकाचा हवामान धोक्यासाठीचा संरक्षण कालावधी 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आला होता.
वरील दोन्ही वर्षीचा शासन निर्णय हा दिनांक 28 सप्टेंबर रोजी निर्गमित झाल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली होती, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल मेहेर यांनी केले. अनिल मेहेर म्हणाले की, चालू वर्षी 2019 मध्ये फळ पीक विमा योजनेचा शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2019 ला निर्गमित होऊन फळ पिकांसाठी हवामान धोक्यासाठीचा संरक्षण कालावधी 8 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे; परंतु मागील वर्षाचा विचार करता चालू वर्षी 23 दिवसांचा विमा कालावधी कपात झाला आहे आणि याच कालावधी दरम्यान (15 ऑक्टोबर 2019 पासून पुढे आजपर्यंत) पडलेल्या अवेळी पावसामुळे भाजीपाला व फळ पिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.
2017-2018 आणि 2018-19 राबवली होती योजना
मागील दोन वर्षांत निर्गमित झालेल्या फळ पीक विमायोजनेंतर्गत शासन निर्णयाचा अभ्यास करता हा शासन निर्णय होण्यासाठी शासनस्तराहून 45 दिवस उशीर झाल्यामुळे चालू वर्षीचा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरत आहे. या निर्णयातील पीक विम्याचा कालावधी हा 2017-18 आणि 2018-19 या वर्षाप्रमाणे याही वर्षी (2019-20) आंबिया बहार फळ पीक विमा योजनेंतर्गत 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत देणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात सर्वदूर अवेळी पावसामुळे सर्वच पिकांचे अपरीमित नुकसान झाले असून अद्यापही पाऊस सुरूच आहे.
शासन निर्णयातील हवामान धोक्यासाठीचा संरक्षण कालावधी हा मागील दोन्ही वर्षाप्रमाणेच 2019-20 करिता लागू करण्याची मागणी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, संचालक तानाजी वारुळे, अरविंद मेहेर, एकनाथ शेटे, रत्नदीप भरविरकर, बी.के भुजबळ यांनी केली.
पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची
अवेळी पावसामुळे दरवर्षी भाजीपाला व फळ पिकांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान होत असते. ही बाब विचारात घेऊन सरकारने हवामानाधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून, ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची आहे. दरवर्षी मृग व आंबिया बहराकरिता ही योजना लागू केली जाते.