वाहतूकदारांच्या संघटनेची रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी
नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने लॉकडाऊनमुळे कर्ज घेणाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत हप्ता न देण्याची सवलत दिली आहे. मात्र, ही सवलत पुरेशी नसून या सवलतीची कालमर्यादा 31 डिसेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी वाहतूकदारांच्या संघटनेने रिझर्व बॅंकेकडे केली आहे.
वाहतूक क्षेत्र अजूनही मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या किंवा उद्योजक इतक्यात हप्ता देऊ शकणार नाहीत. असे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने रिझर्व बॅंकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले.
रिझर्व बॅंकेने ही सवलत सुरुवातीला 1 मार्च ते 31 मे दरम्यान दिली होती. नंतर परिस्थिती न सुधारल्यामुळे ही सवलत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. आता यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. हे वर्ष संपेपर्यंत तरी वाहतूक क्षेत्रासमोरील प्रश्न सुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या क्षेत्राला अधिक सवलतीची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. वाहनधारकांना महसूल कमी झाल्यामुळे ते आत्ता हप्ता देऊ शकत नाहीत. बॅंकाकडून त्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा वाढला असल्याचे ते म्हणाले.
फक्त पन्नास टक्के वाहने रस्त्यावर
सध्या प्रवासी आणि मालवाहतूक थंडावले आहे. त्यामुळे एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्के वाहने रस्त्यावर आहेत, असे असे या संघटनेचे अध्यक्ष कुलतरण सिंग अटवाल यांनी सांगितले. वाहनावरील वरील कर वाढले आहेत, डिझेलचे दर वाढले आहेत, वाहतुकीवेळी भ्रष्टाचार होतो. यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. मात्र, वाहन सेवांची मागणी कमी आहे असे ते म्हणाले.