पुणे – महापालिकेत नुकतीच 23 गावे समाविष्ट झाल्याने जलसंपदा विभागाने पाण्याचा कोट्यामध्ये वाढ केली आहे. त्यानुसार पालिकेला पावणे दोन टीएमसी जादा कोटा मंजूर केला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.
2021-22 या वर्षासाठी महापालिकेसाठी पाणी वापराचे अंदाजपत्रक पालिकेकडून जलसंपदा विभागाला सादर करण्यात आले होते. त्यामध्ये नवीन 23 गावे समाविष्ट झाल्याने पाण्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यंदा चांगला पाऊस झाल्याने खडकवासला प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे.
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी व शहरी भागात पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता मात्र योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. दरम्यान, ग्रामीण व शहरी भागासाठी किती पाणी द्यायचे याचा निर्णय पुढील महिन्यात होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे. जलसंपदा विभागाकडून वर्षभरासाठीच्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे.
मागील कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेचा पाण्याचा वापर वाढत आहे. मंजूर असलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी महापालिकेकडून उचलले जात आहे. तसेच लोकसंख्येची खरी आकडेवारी महापालिकेकडून मिळत नाही, असा आरोप जलसंपदा विभागाकडून करण्यात आला होता. नियमानुसार 155 प्रतिलिटर प्रतिमाणसी इतके पाणी महापालिकेने घेतले पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र 270 प्रतिलिटर प्रतिमाणसी याप्रमाणे पाणी उचलत असल्याचे जलसंपदा विभागाकडून या बैठकीत सांगण्यात आले.
पाण्याचा गैरवापर थांबवा
पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचा किती वापर होतो हे तपासण्यासाठी महापालिकेने ऑडिट करावे, चोरी रोखण्यासाठी पथके नेमा, पोलिसांची मदत घ्या आणि पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कालवा समितीच्या आगामी बैठकीत याचा आढावा घेतला जाणार आहे.
18.58 टीएमसीची मागणी
महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे वार्षिक एकूण 18.58 टीएमसी इतकी पाण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पाण्याची ही मागणी मंजूर करण्याबाबत पालिका आग्रही आहे. पाण्याची वार्षिक मागणी पुढील महिन्यात होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे.