जुन्नर -सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसाने कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वडज धरणात रविवारी (दि. 4) सायंकाळपर्यंत 0.84 टीएमसी (71.62%) पाणीसाठा झाला आहे, तर माणिकडोह धरणात 5.37 टीएमसी (52.75%) पाणीसाठा झाला. तर कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण 100 टक्के भरले असून, घोड नदीतून विसर्ग सोडला आहे.
पावसामुळे व इतर धरणांतून आलेल्या पाण्यामुळे येडगावच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हे धरण 95 टक्के भरले आहे. पिंपळगाव जोगा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरण 10 टक्के भरले आहे. वडज धरणातून मीना नदीत 7500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु केल्याची माहिती वडज धरणाचे शाखा अधिकारी टी. एन. चिखले व स्थापत्य अभियंता जगन्नाथ मांडे यांनी दिली. मीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात हे प्रमुख पीक व उपजीविकेचे साधन असून अतिपावसामुळे बांध फुटणे, रोपे पडणे, रोपे वाहून जाणे आदी समस्यांना येथील शेतकरी सामोरे जात आहेत. तर सोयाबीन व टोमॅटो या प्रमुख पिकांनाही या जोरदार पावसामुळे फटका बसत आहे.