नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिली माहिती
नवी दिल्ली : बेकायदेशीर पद्धतीने भारताकडून बांगलादेशमध्ये निघालेल्या स्थलांतरितांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. 2018 मध्ये 50 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या सर्वांना अटक केली. 2018 मध्ये ही संख्या 2971 इतकी होती तर 2017 मध्ये ती 1800 होती. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने ही माहिती दिली आहे. बेकायदा पद्धतीने स्थलांतर करताना अटक करण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेशही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने याविषयी माहिती दिली आहे. 2018 मध्ये बेकायदा पद्धतीने बांगलादेशकडे निघालेल्या आणि अटक करण्यात आलेल्या स्थलांतरितांची संख्या 2971 होती. यामध्ये 1532 पुरुष, 749 महिला आणि 690 लहान मुलांचा समावेश होता.
एकीकडे भारतातून बांगलादेशकडे निघालेल्या स्थलांतरितांची संख्या 2018 मध्ये वाढली असताना दुसरीकडे बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या घुसखोरांची संख्या कमी झाली आहे. 2018 वर्षामध्ये 1118 स्थलांतरितांनी बांगलादेशमधून भारतात बेकायदा पद्धतीने प्रवेश केला. त्याच्या आधीच्या वर्षात हाच आकडा 1180 इतका होता. बेकायदा पद्धतीने घुसखोरी करणाऱ्यांचा नक्की हेतू काय होता, याची माहिती सीमा सुरक्षा दलाने दिलेली नाही. पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील सीमांच्या रक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे.