आठ महिन्यांत दुसऱ्यांदा निर्णय
पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रांतील रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे. दि. 1 ऑगस्टपासून नवे दर लागू होतील. दरम्यान, मागील आठ महिन्यांत दुसऱ्यांदा भाडेवाढ झाल्याने रिक्षाचालकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे.
वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी विविध रिक्षा संघटनांनी आरटीओकडे केली होती. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, विविध रिक्षा संघटना आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. यात झालेल्या निर्णयानुसार पहिल्या दीड किलोमीटसाठी 2 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक 1 किलोमीटरसाठी 1 रुपया भाववाढ केली आहे.
त्यानुसार दि. 1 ऑगस्टपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 23 रुपये, तर त्यापुढील प्रत्येक 1 किलोमीटरसाठी 15 रुपये दर आकारला जाईल. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रात 25 टक्के, तर ग्रामीण भागात अतिरिक्त 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे.
रिक्षा चालकांना दि. 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. जे रिक्षाचालक मीटर पुनःप्रमाणीकरण करतील, त्यांनाच नवीन भाडेवाढ लागू असणार आहे.
मागील काही महिन्यांपासून इंधन दरवाढ होत आहे. यापूर्वी भाडेवाढ केली, तेव्हा सीएनजीचे दर आणि आताचे दर यात 40 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ गरजेची होती. आम्ही या निर्णंयाचे स्वागत करतो. पण, रिक्षा चालकांच्या इतरही काही मागण्या आहेत. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदन दिले असून त्यांचाही विचार प्रशासनाने करावा.
– श्रीकांत आचार्य, सल्लागार, आम आदमी रिक्षा चालक संघटना.
क्षेत्र आणि रिक्षांची संख्या
पुणे शहर : 82,523
पिंपरी-चिंचवड – 24,770
बारामती -1,829