मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याविषयीचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली असल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आम्ही नेहमीच शरद पवारांना भेटत असतो, अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असतं, त्यानुसार भेट झाली.”
दरम्यान, पवार कुटुंबापासून आम्हाला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी.”
सदाभाऊ खोत हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी एका हॉटेलचालकाने त्यांना अडवून, अनेक महिन्यांपासून जेवणाचे बिल रखडल्याचा आरोप केला होता. मात्र सदाभाऊ खोत यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यावेळी त्यांनी ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची चाल असल्याचा आरोप केला होता. टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीचा नेता यामागे होता. तसंच राष्ट्रवादी पक्षापासून विशेषत: पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोपही केला होता.