इंडिया ब्रँड ऑडिटच्या अहवालातील ताजी माहिती
नवी दिल्ली : जगात सर्वत्र प्रदूषणाबाबत जनजागृती होत आहे त्यातही प्लास्टिक मुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा विषय जास्तच गांभीर्याने घेतला जातो. भारतातही प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय असतानाच आता ब्रँड इंडिया ऑडिट या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या ताज्या अहवालाप्रमाणे देशातील बिस्कीट आणि चिप्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या प्लास्टिकपॅकेज मुळेच प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
भारतामध्ये प्लास्टिकमुळे जे प्रदूषण निर्माण होते त्यामध्ये 15 टक्के जबाबदारी इंटरनॅशनल ब्रँडची आहे दहा टक्के प्लास्टिक प्रदूषणाला भारतीय कंपन्या जबाबदार आहेत. परदेशी कंपन्यांच्या शीतपेयांमुळे भारतामध्ये प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शीतपेयांच्या बाटल्या असोत बिस्किटे आणि चिप्सची पाकीटे असोत हे पदार्थ वापरून झाल्यानंतर त्या बाटल्या आणि पाकिटे निष्काळजीपणे फेकून देण्यात येत असल्याने या प्रदुषणात वाढ झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
शीतपेयाच्या कंपन्या किंवा बिस्कीट आणि चिप्स उत्पादक कंपन्या आपल्या पॅकेजिंगसाठी जे प्लास्टिक वापरतात ते योग्य प्रमाणात रिसायकल होत नसल्याने हा प्रश्न गंभीर झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या संस्थेने 2021 मध्ये 19 राज्यांमध्ये दीड लाखापेक्षा जास्त प्लास्टिकच्या तुकड्यांचे निरीक्षण केले असता हा निष्कर्ष समोर आला आहे. या कचऱ्याच्या तुकड्यांमध्ये पंधरा टक्के हिस्सा हा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा होता दहा टक्के हिस्सा भारतीय ब्रँडच्या कंपन्यांचा होता.
सरकारने गेल्यावर्षी सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी अशा खाद्य आणि पेय उत्पादनांसाठी वापरण्यात येणाऱ्या मल्टी प्लेयर प्लास्टिकच्या वापरावर बंदी नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. साहजिकच बिस्किटे आणि इतर खाद्य पदार्थ किंवा शितपेयाच्या बाटल्यामुळे निर्माण होणाऱ्या प् प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिसायकलिंगची एखादी नवीन यंत्रणा राबवावी लागणार आहे. पॅकेजिंगसाठी जे मटेरियल वापरले जाते त्याचे रिसायकलिंग करण्यात यावे म्हणून या सर्व कंपन्या दरवर्षी काही प्रमाणात निधी सरकारकडे देत असतात. त्या निधीचा योग्य वापर करून मल्टी लेयर प्लास्टिकचे रिसायकलिंग करण्याबाबत सरकारने विचार करावा अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.