नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, 12 तासांत दहशतवाद्यांनी 2 गैर-काश्मीरींची गोळ्या मारून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये बिहारचा रहिवासी दिलखुश कुमारचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसरीकडे गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. आतापर्यंत एकूण 4 हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरी पंडितांचे पुन्हा एकदा स्थलांतर पाहायला मिळत आहे. काश्मीर खोर्यातून रात्री उशिरा मोठ्या संख्येने कर्मचारी जम्मूला पोहोचले. काश्मिरी पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांनंतर काश्मिरी पंडितांची मागणी लक्षात घेऊन खीर भवानी यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत चालली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएम पॅकेज अंतर्गत कर्मचारी अमित कौल यांनी सांगितले की, परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. पुन्हा 4 हत्या झाल्या आहेत. 30-40 कुटुंबे शहर सोडून गेली आहेत. आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांची (सरकारची) सुरक्षित ठिकाणे फक्त शहरात आहेत, श्रीनगरमध्ये सुरक्षित जागा उपलब्ध नाही.
Jammu, J&K | Situation is getting worse. 4 killings took place today. 30-40 families have left the city. Our demand was not fulfilled. Their (govt’s) safer places are within the city only, no safe place is available in Srinagar, said Amit Kaul, an employee under PM package pic.twitter.com/tOy8d6BGGl
— ANI (@ANI) June 2, 2022
8 जूनपासून खीर भवानी यात्रेची तयारी सुरू होणार होती. मंदिराची स्वच्छताही बरीच झाली, मात्र मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांच्या हत्येचा निषेध सातत्याने सुरूच होता. गेली दोन वर्षे सोडली तर 1994 पासून ही यात्रा अखंडपणे सुरू आहे. मात्र आता परिस्थिती बिघडल्याचे काश्मिरी पंडितांचे मत आहे. सध्या खीर भवानी यात्रा पुढे ढकलण्यात आली असली तरी अमरनाथ यात्राही 30 जूनपासून होणार आहे. अशा स्थितीत भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.