मुंबई – रिझर्व बॅंकेने व्याजदरात 0.40 टक्के वाढ करून रोख राखीव प्रमाणात 0.50 टक्क्यांची वाढ केल्यानंतर व्यवसायिक बॅंकांनी अपेक्षेप्रमाणे कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
किंबहुना व्यवसायिक बॅंकांना रिझर्व्ह बॅंक कोणत्याही क्षणी व्याजदरात वाढ करू शकते याचा अंदाज आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून काही बॅंकांनी आपल्या कर्ज आणि ठेवीवरील व्याज दरात वाढ करण्यास सुरुवात केली होती.
कोटक महिंद्रा बॅंकेने 390 दिवस ते तेवीस महिन्याच्या ठेवीवरील व्याजदरात 0.30 ते 0.35 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. त्याचबरोबर बंधन बॅंक, जन स्मॉल फायनान्स बॅंक, बडोदा बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने ठेवीवरील व्याज दरात वाढ केली आहे. बंधन बॅंकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की एक वर्ष ते 18 महिन्यापर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बॅंकेने लगेच एक्स्टर्नल बेंचमार्क लॅंडिंग रेट मध्ये 0.40 टक्क्यांची वाढ करून तो 8.10 टक्के केला आहे. अर्थात ही व्याजदर वाढीची सुरुवात आहे. पुढील आठवड्यामध्ये देशातील बहुतांश बॅंका आपल्या कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरात वाढ करणार आहेत असे दिसून येते. रिझर्व बॅंकेकडून व्यावसायिक बॅंका ज्या व्याजदरावर कर्ज घेतात त्याला रेपो दर म्हणतात. या रेपो दरामध्ये रिझर्व बॅंकेने 0.40 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे सर्वच बॅंका त्या प्रमाणात आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करणार आहेत.
एवढेच नाही तर आता बरेच नागरिक जास्त व्याज दरासाठी आपला पैसा बॅंकात ठेवण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराचे निर्देशांकात कोसळत असल्यामुळे शेअर बाजारातून परतावा कमी मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिक आपली गुंतवणूक महागाईपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जास्त परतावा देणाऱ्या वित्तीय उत्पादनात गुंतवणूक करीत असतात. त्यामध्ये बॅंकांतील ठेवी व सोने-चांदी इत्यादीचा समावेश असतो.