पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला असता गेल्या 11 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर खूनांच्या घटनांमध्ये किंचित घट झाल्याचे दिसून येते. गुन्हेगारी आटोक्यात यावी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. परंतु चोरी, वाटमारी, घरफोडी अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले असल्याचे आकड्यांवरुन दिसून येत आहे.
एक जानेवारी ते 31 नोव्हेबर 2019 या कालावधीत घडलेल्या गुन्हेगारीचा आढावा घेतला असता गेल्यावर्षीच्या तुलनेत काही गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. तर काही गंभीर स्वरूपाच्या घटनांमध्ये किरकोळ घट झाली आहे. काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नाहीत. तर काही गुन्ह्यांमध्ये आरोपीचे नाव उघड होऊनही ते पोलिसांच्या हातील लागलेले नाहीत. गेल्या वर्षी खूनाचे 64 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 60 गुन्हे उघड झाले आहेत. तर यंदाच्यावर्षी 62 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 59 गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित तीन गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. तसेच खूनी हल्ल्याचे गुन्हे देखील घटल्याचे पहायला मिळते.
सर्वांत महत्वाचे म्हणजे बलात्काराचे गुन्हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 ने वाढ झाली आहे. तर विनयभंगाचे गुन्हे 100 ने वाढले आहेत. जबरी चोरीचे गुन्हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 74 ने वाढ झालेली असून ही चिंताजनक बाब आहे. यंदाच्या वर्षी पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. वाहन चोरीचे गुन्हे 170 ने घटले असले तरी अकरा महिन्यात दोन हजारांहून अधिक वाहने चोरट्यांनी पळविली आहेत. फसवणुकीचे गुन्ह्यात देखील 92 वाढ झाली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक नव्याने स्थापन झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या पथकाने केलेल्या कारवाईमुळे 23 गुन्हे जादा दाखल झाले आहेत.
“ती’ असुरक्षितच
गुन्हेगारी आढावा बैठकीमध्ये समोर आलेले आकडे महिला सुरक्षेच्या बाबतीत अतिशय चिंताजनक असे आहेत. घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी महिला असुरक्षितच असल्याचे दिसून आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 151 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर केवळ अकरा महिन्यांमध्ये 397 महिलांना विनयभंगाचा दंश झेलावा लागला आहे. घराबाहेर वासनांध आणि नराधमांकडून छळ होत असतानाच घरात देखील महिला सुखात नसल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या कारणांनी आणि विशेषतः हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे विवाहितांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. अकरा महिन्यांमध्ये 48 विवाहितांनी आपले जीवन संपविले.